रांधे : प्रतिनिधी
शेतामधील शेती पंपाची मोटार बंद करून मंगळवारी पहाटे घराकडे परतणारे शेतकरी सुरेश पंढरीनाथ आवारी यांच्यावर बिबट्याने झडप घालून त्यांना फरफटत लगतच्या कॅनॉलमध्ये नेले. हातातील बॅटरीने मारून आवारी यांनी बिबटयाचा प्रतिकार करण्याचाही प्रयत्न केला, परंतू त्याला बिबट्याने दाद दिली नाही. त्याच वेळी स्वामी समर्थ केंद्रामधील ध्वनीक्षेपकावरील भजन सुरू झाले. भजनाच्या आवाजाने बिबट्या सावध झाला. त्याच्या जबडयातील आवारी यांचा पाय सोडून बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला. स्वामी समर्थंच्या भजनामुळे आवारी यांची सुटका झाल्याने त्यांच्या मदतीला स्वामी धाऊन आल्याची भाविकांची भावना आहे.
बिबट्याच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर सुरेश यांनी पत्नीस फोन करून घटनेची माहीती दिली. त्यांनी दिर नवनाथ आवारी, अनिल आवारी, संदीप गहाणडूले यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याने चावा घेतल्याने आवारी यांना वेदना असहाय्य होत होत्या. अनिल आवारी यांनी वनरक्षक श्रीहरी आठरे, उमेश खराडे यांच्याशी संपर्क केला. ते घटनास्थळी दाखल झाल्यानंतर खाजगी वाहनातून आवारी यांना नगरच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या घटनेची माहीती समजल्यानंतर सरपंच संतोष काटे, तंटामुक्तीचे मा. अध्यक्ष भास्कर आवारी, दत्तू आवारी, साईनाथ झिंजाड, संजय आवारी, दिलीप आवारी, विठ्ठल नाना आवारी, सोनल अनिल आवारी, अनिता खोसे, शितल पिंगळे, सुनिता आवारी, शांताबाई आवारी, प्रमिला आवारी यांनीही घटनास्थळी भेट देत सुरेश आवारी यांना धीर देत त्यांना उपचारासाठी पाठविण्यासाठी मदत केली.
❝ अळकुटी येथे उपचाराची सोय हवी
रांधे परिसरात बिबट्याने मनुष्यावर हल्ला करण्याच्या चार ते पाच तर पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्याचा वीस ते पंचविस घटना घडल्या आहेत. अळकुटी परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. बिबट्या किंवा तत्सम हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यानंतर त्यावरील उपचारासाठी अहिल्यानगर येथे जावे लागते. हे ७० ते ८० किलोमीटरचे अंतर पार पाडेपर्यंत रूग्णाचा जीवही जाऊ शकतो. याचा विचार करून बिबट्यांचे वाढते हल्ले लक्षात घेउन अळकुटी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अशा उपचाराची सोय करण्यात यावी.
अनिल रामचंद्र आवारी
श्री.स्वामी समर्थ देवस्थान, रांधे