हिवरे बाजार : प्रतिनिधी
आदर्शगाव म्हणून ओळख असलेल्या हिवरे बाजार गावालगतच्या डोंगराला शनिवारी (दि. १९ एप्रिल) दुपारी १ वाजता आग लागली. आग लागल्यानंतर ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील तरुण, ग्रामस्थ आणि ग्रामवन समितीचे सदस्य यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सलग पाच तास अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात ग्रामस्थांना यश आले.
सध्या उन्हाळ्याचे तापमान वाढल्याने डोंगर परिसर कोरडा झाला असून, छोट्याशा ठिणगीनेही आग वेगाने पसरते. यावेळी शेजारील गावातील काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेताच्या बांधाला आग लावल्यामुळे ती डोंगराच्या दिशेने गेली आणि वनसंपदा धोक्यात आली.
ही आग मागील महिन्यात डोंगर परिसरात लागलेल्या तिसऱ्या वणव्याची घटना असून, ग्रामस्थांनी या अगोदरही अशाच प्रकारच्या आगी विझविल्या आहेत. विशेष म्हणजे, सन २०१८ पासून आजपर्यंत २३ वेळा हिवरे बाजार ग्रामस्थांनी डोंगरावर लागलेल्या आगी स्वतः विझवल्या आहेत.
कोणतीही शासकीय मदत न घेता, केवळ संघटितपणा, सामाजिक जाणीव आणि पर्यावरणप्रेमाच्या बळावर हिवरे बाजारने संकटांशी सामना केला आहे. गावकऱ्यांची ही बांधिलकी इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.